झोपेचे महत्त्व – मराठी निबंध | Zopeche Mahattv Nibandh Marathi |

प्रस्तुत लेख हा झोपेचे महत्त्व (Zopeche Mahattv Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. माणसाची झोप किती महत्त्वाची आहे आणि झोपेमुळे आपल्याला काय काय लाभ होतात याबद्दलची सविस्तर माहिती या निबंधात देण्यात आलेली आहे.

झोपेचे महत्त्व – मराठी निबंध | Importance of Sleep Marathi Essay |

आपल्या ऊर्जेचा मूळ स्त्रोत हा सूर्य असतो. सूर्याच्या गतीनुसार जर आपण आपल्या क्रिया चालू ठेवल्या तर आपण एक उर्जादायी जीवनानुभव प्राप्त करू शकतो. असा हा जीवनदायी सूर्य उगवल्यानंतर दिवस असतो तर मावळल्यानंतर रात्र होत असते. दिवसा आपण जागे असतो तर रात्री झोपत असतो.

निसर्गतः रात्र होत असते तेव्हाच मनुष्य आणि इतर सजीव झोपतात. म्हणजेच आपण दिवसा जागरण केल्यानंतर शारिरीक स्तरावर खूप साऱ्या ऊर्जेचा वापर होत असतो. त्या ऊर्जेची पुनर्बांधणी होण्यासाठी आणि झालेली सर्व शारिरीक झीज भरून येण्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे.

आपण बुध्दी, मन, शरीर अशा वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असतो. या सर्व स्तरांवर आरामाची गरज असते म्हणजेच सर्व अवयवांना विश्रांतीची गरज असते. ती विश्रांती आपल्याला रात्री झोपेत मिळत असते. त्या विश्रांतीनंतर आपल्याला अगदी ताजेतवाने वाटते.

सध्या आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार केल्याने आणि तांत्रिक उपकरणांच्या अतिवापरामुळे माणसाची झोप नाहीशी झालेली आहे. रात्री लवकर झोपून लवकर उठणे ही सवय बहुतांश लोकांमध्ये आढळत नाही. याउलट चुकीच्या आहाराच्या सवयी आणि आणि आवश्यक शारिरीक कष्ट नसल्याने झोप मात्र नाहीशी झालेली आहे.

रात्री पुरेशी झोप न घेतल्याने दिवसा उशिरापर्यंत झोपणे, कोणत्याही कामात रस न वाटणे, चिडचिड होणे, डोकेदुखी, अपचन असे विकार उद्भवतात. झोपेची गरज वेळेवर पूर्ण होत नसल्याने इतर शारिरीक क्रियांवर त्याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. त्यामुळे मानवी स्वभावात मानसिक विक्षिप्तता निर्माण होत आहे.

आपण दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे पाहू शकतो ज्यांमुळे आपल्याला झोपेचे महत्त्व समजून येईल. रात्रीची झोप पूर्ण झाल्यावर आपल्याला सकाळी एकदम ऊर्जावान अनुभव येत असतो. आपण आजारी असल्यावर झोप घेतो तसेच शारिरीक थकवा आल्यावर सुद्धा झोप घेत असतो.

साधारणतः मानवासाठी रात्रीची सहा ते आठ तास झोप पुरेशी असते. रात्रीची शांततापूर्ण झोप ही आपल्यासाठी एक वरदान ठरू शकते. झोप पूर्ण झाल्यावर आपल्या सर्व शारिरीक क्रिया सुरळीत पार पडतात. आपली बुद्धी, इंद्रिये आणि इतर अवयव अगदी पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या स्थितीत असतात.

आजची स्थिती पाहता सकाळी उशिरा उठणे आणि रात्री उशिरा झोपणे या सवयी अनेक मार्गांनी आपल्याला जडलेल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिकरित्या रात्रीच्या वेळेत आवश्यक असणारी झोप आपल्याला मिळत नाही. झोप न मिळाल्याने मग अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधी आपल्याला जडतात.

झोप न मिळाल्याने काय तोटे होतात आणि पुरेशी झोप घेतल्याने काय फायदे होतात याबद्दलची अचूक माहिती जाणून घ्यायला हवी. आज इंटरनेट आणि मोबाईलमुळे ती माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. तशी माहिती मिळाल्यास प्रत्येकाला झोपेचे महत्त्व सहजच समजेल.

तुम्हाला झोपेचे महत्त्व हा मराठी निबंध (Zopeche Mahattv Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment