विद्यार्थी आणि मैदानी खेळ – निबंध | Vidyarthi Ani Maidani Khel Nibandh

प्रस्तुत लेख हा विद्यार्थी आणि मैदानी खेळ (Vidyarthi Ani Maidani Khel Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात विद्यार्थ्यांच्या जीवनातील खेळाचे महत्त्व तसेच त्यांच्यासाठी खेळाचे असलेले फायदे व तोटे स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

विद्यार्थी आणि मैदानी खेळ – मराठी निबंध | Vidyarthi Ani Maidani Khel Nibandh Marathi |

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच शिक्षणाचे ध्येय असायला हवे. असे ध्येय प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक आणि शारिरीक विकास होत राहणे अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यासासोबतच खेळ हा देखील तितकाच महत्त्वाचा पैलू आहे. खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमता व कौशल्ये यांचा विकास होत असतो.

साधारणतः बैठ्या खेळांत शारिरीक हालचाल करावी लागत नाही. याउलट मैदानी खेळ खेळण्यात मेहनत, कौशल्य, क्षमता अशा सर्व बाबींचा कस लागतो. कस लागल्यानंतर विद्यार्थ्याला जिंकण्याचे आव्हान असते आणि हरण्याची भीती देखील असते. अशी आव्हाने आणि भितींचा सामना करूनच विद्यार्थी विकसित होत जातो.

खेळ खेळताना जिंकण्याचा अतोनात प्रयत्न करणे, जिंकल्यानंतर जल्लोष करणे, पराभूत झाल्यानंतर पराभवाची कारणे शोधून पुन्हा खेळासाठी तयार असणे असे अत्यंत महत्त्वपूर्ण गुण विद्यार्थी लहानपणीच शिकतो. असा अनुभवयुक्त विद्यार्थी हा आयुष्याच्या खेळात देखील सहसा हरत नाही.

विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळ हा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात बहुसंख्येने सहभागी व्हायला हवे. त्यासाठी शालेय जीवनात असताना त्यांच्यासाठी खेळाचे प्रशिक्षक असायला हवेत. शालेय, तालुका आणि जिल्हा स्तरावर वारंवार विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करायला हव्यात.

सध्या तंत्रज्ञान विकसित झाल्याने टेलिव्हिजन, मोबाईल फोन, संगणक अशी उपकरणे विद्यार्थ्यांच्या जीवनात आलेली आहेत. विद्यार्थ्यांसाठी ती उपकरणे घातक ठरत आहेत कारण दिवसातील खूप सारा वेळ उपकरणे वापरण्यात वाया जात आहे. त्यामुळे विद्यार्थी मैदानी खेळ खेळण्याची इच्छाच करेनासे झालेत.

विद्यार्थी हे उत्साही आणि आनंदपूर्ण तेव्हाच होऊ शकतील जेव्हा त्यांची जीवनऊर्जा संचारीत असेल. जीवनऊर्जा संचारित करण्याचा मार्ग म्हणजेच शारिरीक हालचाल! खेळाने आवश्यक असलेली हालचाल होत असते आणि हालचाल झाल्याने घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जात असतात.

सध्या क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खो – खो, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, धावणे, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, कुस्ती, बॉक्सिंग असे नानाविध मैदानी खेळ खेळले जातात. त्यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक अशा खेळांचा समावेश आहे. विद्यार्थी आपल्या आवडीनुसार कोणत्याही एका खेळाच्या प्रकारात आपली कारकीर्द घडवू शकतात.

खेळामुळे विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्य देखील लाभते. त्या मानसिक स्वास्थ्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. विद्यार्थी खेळानंतर अत्यंत प्रसन्न आणि एकाग्र चित्ताने अभ्यास करतात. खेळल्याने मुलांचे लक्ष अभ्यासात लागणार नाही हा अत्यंत चुकीचा समज सर्वत्र पसरलेला आहे. त्याबाबतीत आपण जागृत होऊन मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त करायला हवे.

शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती जीवनातील सुख आणि आनंद उपभोगू शकतो. खेळामुळे नैसर्गिकरित्या आरोग्य प्राप्ती होत असल्याने विद्यार्थ्यांवर स्वस्थ शरीराचे आणि आरोग्यपूर्ण जीवनाचे संस्कार लहानपणीच होतील. ते आयुष्यभर तशा संस्कारांनी आपले जीवन सुखकर बनवू शकतील.

सध्या प्रवास हा खूपच सोयीस्कर झालेला असून खेळाचे सर्व साहित्य आणि मार्गदर्शनही सहज उपलब्ध आहे. अगदी मोबाईलचा वापर करून देखील विद्यार्थी खेळाची प्राथमिक माहिती मिळवू शकतात. सध्या खेळामध्ये विद्यार्थ्यांना कारकिर्दीच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अशा संधी ओळखून विद्यार्थ्यांनी कोणताही एक खेळ खेळणे, हे त्यांचे आयुष्य घडवू शकते.

तुम्हाला विद्यार्थी आणि मैदानी खेळ हा मराठी निबंध (Vidyarthi Ani Maidani Khel Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment