विद्यार्थी आणि मोबाईल – मराठी निबंध | Vidyarthi Ani Mobile Nibandh

प्रस्तुत लेख हा विद्यार्थी आणि मोबाईल (Vidyarthi Ani Mobile) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. आजच्या विद्यार्थ्यांचा वेळ हा अभ्यास आणि मोबाईल यामध्ये विभागला गेला आहे.

मोबाइलचा अतिवापर हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम घडवून आणत आहे. त्यामुळे अभ्यासाविषयी एक उदासीनता निर्माण झालेली आहे. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात घडत असलेले बदल या निबंधात स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

विद्यार्थी आणि मोबाईल निबंध | Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi |

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज प्रत्येकजण सहजरित्या मोबाईल वापरत आहे. अगदी २०१९ पर्यंत बहुतांश विद्यार्थी मोबाईल वापरत नसत, परंतु कोरोना काळात प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईलचा प्रवेश झाला. कोरोनाचा प्रभाव कमी झाला परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचे अस्तित्व मात्र वाढतच गेले.

विद्यार्थी सुरुवातीला ऑनलाईन तास, ऑनलाईन अभ्यास अशा निमित्ताने मोबाईल हाताळत होते. तेव्हा शिक्षणही ऑनलाईन होते, परंतु आता शाळा सुरू झाल्याने ऑनलाईन शिक्षण कमी झाले. तेव्हा अभ्यासासाठी हाताळत असलेला मोबाईल हा विद्यार्थ्यांसाठी कधी व्यसन बनून गेला हे कळालेच नाही.

विद्यार्थ्यांसाठी शारिरीक हालचाल आणि मैदानी खेळ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांची मानसिक व शारिरीक वाढ ही खेळाच्या निमित्ताने होत असते. परंतु मोबाईल वापरत असल्याने विद्यार्थी आता फक्त ऑनलाईन खेळ खेळू लागलेत. त्यामध्ये त्यांचा खूप सारा वेळ वाया जात आहे.

ऑनलाईन खेळ, सोशल मीडिया आणि वेबसीरीज अशा प्रकारच्या मनोरंजनामुळे विद्यार्थी हे आततायी बनू लागलेत, लगेच रागावू लागलेत, भावनिक नियंत्रण हरवू लागलेत. तसेच मानसिक स्थैर्य लहान वयात नसताना हिंसा, प्रेम, क्रोध, घृणा अशा भावना ते अनुभवू पाहतायेत.

मोबाईलचा वापर हा इंटरनेटमुळे अत्यंत सोयीस्कर झालेला आहे. विद्यार्थी देखील मोठ्या लोकांप्रमाणे सोशल मीडियाचा वापर करत आहेत. स्वतःची ऑनलाईन प्रोफाइल त्यांना अत्यंत महत्त्वाची वाटत आहे. स्वकेंद्री व एका आभासी दुनियेत त्यांचा वावर वाढत आहे. त्यांचे ध्यान आता फक्त मोबाईलमध्येच खिळून राहिलेले आहे.

दहा – पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा स्मार्टफोन अस्तित्वात नव्हते तेव्हाचे विद्यार्थी हे खूप साऱ्या इतर कार्यांत स्वतःला आजमावून पाहत होते. शारिरीक श्रम देखील करत होते. त्यामुळे मानसिक व शारिरीक स्थैर्य त्यांच्या जीवनात सहज निर्माण होत होते. मोबाईलमुळे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये तशी कल्पकता व समरसता दिसून येत नाही.

आजच्या काळात विद्यार्थी हा मोबाईलवरच सर्व वेळ खर्च करत आहे. त्यामुळे डोळे, मान, मेंदू, पाठ, त्वचा अशा अवयवांना धोका निर्माण होत आहे. शारिरीक हालचाल कमी झाल्याने विद्यार्थी लगेच थकत आहेत. बौध्दिक काम त्यांना नकोसे वाटू लागले आहे. अशाने हेच विद्यार्थी भविष्यात जीवनाप्रती असंवेदनशील बनतील.

कारकीर्द व शैक्षणिक प्रगती अशा बाबी या निरर्थक वाटू लागलेल्या आहेत. काही अपवादात्मक विद्यार्थी आहेत जे घवघवीत यश प्राप्त करत आहेत मात्र संवेदना हरवलेले विद्यार्थी हे जास्त प्रमाणात आहेत. विद्यार्थ्यांचे आयुष्य हे मोबाईलने व्यापलेले असल्याने स्क्रीन व्यतिरिक्त इतरत्र ध्यान देणे हे त्यांच्यासाठी अवघड जात आहे.

मोबाईलला शाळेत बंदी असतानाही विद्यार्थी चोरून चोरून मोबाईल वापरत आहेत. अगदी लहान वयात ऑनलाईन स्टेटस निर्माण करू पाहणे, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणे, फॉलोअर्स, सबस्क्राईबर्स वाढवणे यातच विद्यार्थ्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे. जीवनात भरारी घेण्याच्या तरुण वयात विद्यार्थी हे भरकटत चाललेले आहेत.

मोबाईलचा अतिवापर ही विद्यार्थ्यांसाठी फक्त वैयक्तिक समस्या नाही तर ती भविष्यात सामाजिक समस्या देखील असणार आहे. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे जबाबदार नागरिक असणार आहेत. त्यांनी स्वतःची जबाबदारी जर घेतली नाही तर नक्कीच ते भविष्यातील सामाजिक स्थिरतेसाठी घातक ठरतील.

तुम्हाला विद्यार्थी आणि मोबाईल हा मराठी निबंध (Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment