मी योग्य वेळी बोलेनच, तुम्ही शांत रहा…राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडी संचानालायाने नोटीस बजावली असून २२ ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.अशावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते जमू शकतात तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनेही होऊ शकतात. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तमाम महाराष्ट्र सैनिकांना शांतता राखण्याचे जाहीर आवाहन केले आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर व फेसबुक अकाउंट वरून त्याबद्दल जाहीर आवाहन केले आहे. ते खालीलप्रमाणे

जाहीर आवाहन
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस
आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या
अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू.
इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा
सर्वाना विनंती आहे की येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा.
सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी
घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा.
तसंच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण
तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा
जमू नये.
आणि बाकी ह्या विषयावर मला जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.
आपला नम्र
राज ठाकरे

तसेच या दरम्यान मनसे नेत्यांनी सुध्दा पत्रकार परिषद घेऊन शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की ईडी ने राज साहेबांना सकाळी ११.३० वाजता बोलवले आहे. तसेच त्यादिवशी मनसेचे कार्यकर्ते शांतता पाळतील व आम्हाला पूर्ण कल्पना आहे की आमचे कार्यकर्ते पक्षाच्या आदेशानुसार वागतील त्याच्या बाहेर जाणार नाहीत.

हे जरूर वाचा- आज काश्मीर तोडले उद्या मुंबई आणि विदर्भ असेल – राज ठाकरे

Leave a Comment