मोबाईल मराठी निबंध | Mobile Essay In Marathi |

आज असा कोणीही नसेल ज्याला मोबाईल माहीत नाही. मोबाईलचा जसा उपयोग वाढत चाललेला आहे तसे त्याचे फायदे आणि तोटे समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल निबंध (Mobile Essay In Marathi) लिहताना विस्तारपूर्वक मोबाईलचे विश्लेषण करायचे असते.

मोबाईलचे फायदे आणि तोटे – निबंध | Mobile Marathi Nibandh |

आजपासून वीस वर्षांपूर्वी मोबाईल म्हणजे सर्वांना आश्चर्यच वाटत होते. तेव्हा दूरच्या व्यक्तीशी बोलण्यासाठी फोनचा वापर होत असे. कोणा एकाकडे एकदम साधा किपॅडचा मोबाईल असे. तेव्हापासून ते आजपर्यंत मोबाईलची प्रगती पाहता सर्वजण थक्क झालेले आहेत.

किपॅड ते स्क्रीनटच असा हा मोबाईलचा प्रवास झालेला आहे. लोक जसे गाडीला महत्त्व देतात त्याप्रमाणेच मोबाईल वापरणे हेदेखील महत्त्वाचे झाले आहे. विशिष्ट ब्रँडचे मोबाईल्स वापरणे ही तर स्वतःची प्रतिष्ठा वाटू लागली आहे. शरीराला आणखी एक अवयव जोडल्यासारखा मोबाईल माणसाला जोडला गेला आहे.

मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. पूर्वी एकमेकांशी संवाद साधणे म्हणजे पत्र पाठवावे लागत असे, आता मात्र तसे नाही. जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधणे शक्य झाले आहे. इंटरनेट उपलब्ध असल्याने सोशल मीडिया स्तरावरून शाब्दिक संदेश आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकतो.

आत्ताचे मोबाईल्स हे स्मार्टफोन म्हणून ओळखले जातात. ज्यामध्ये बँकेतील रकमेची देवाण घेवाण करता येते. विविध गेम्स खेळता येतात व ऍप्सद्वारे जीवन आणखी सुविधापूर्ण होते. लाईव्ह टीव्ही पाहता येते. यूट्यूब आणि इतर व्हिडिओ स्तरांवरून अनेक क्षेत्रांतील माहिती प्राप्त करता येते. शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रातील लोकांसाठी तर मोबाईल हे वरदानच आहे.

सर्व महत्त्वाची कागदपत्रे आपण मोबाईलमध्ये साठवून ठेवू शकतो. त्यांचे फोटो काढून, स्कॅन करून कायमस्वरूपी मोबाईल फाईल्समध्ये किंवा आपल्या ईमेल अकाउंटवर अपलोड करून सेव्ह करू शकतो. तसेच संगीत, चित्रपट, कॅमेरा फोटोज्, आणि व्हिडिओ शूटिंगचा आनंद आपण मोबाईलमधूनच घेऊ शकतो.

सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी मोबाईलचा अतिवापर घातक ठरू शकतो. डोळे, त्वचा, मणका आणि मेंदू यांवर आता मोबाईलचे अनिष्ट परिणाम दिसू लागले आहेत. सतत मोबाईल वापरल्याने आळस, चिंता व चिडचिडेपणा वाढला आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे.

लहान मुलांना यामधून सावरणे गरजेचे आहे कारण व्हिडिओ गेम्स, वेब सीरिज यामध्ये मुले तासनतास स्वतःचा वेळ वाया घालवत आहेत. शिक्षणही ऑनलाईन झाल्याने मोबाईलचा वापर वाढून डोळ्यांवर आणि मेंदूवर ताण येऊ लागला आहे. तसेच इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर हा त्यांना अकाली प्रौढ बनवत आहे.

मोबाईल हे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित झालेले आहे. त्यामुळे जाणकार मंडळी, मानसोपचार तज्ञ, डॉक्टर आणि मोबाईल कंपन्या या सर्वांनी मानवी हिताचा विचार केला पाहिजे. मोबाईल वापरकर्त्यांना मोबाईलचे फायदे आणि तोटे समजावून सांगितले पाहिजेत. मोबाईल हा उपयोगी आहेच परंतु त्यामुळे मानवी मूल्ये आणि आरोग्य मात्र खराब होता कामा नये.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला मोबाईल मराठी निबंध (Mobile Essay In Marathi) कसा वाटला, त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की आम्हाला कळवा..

Leave a Comment