केस माझे ..पण केसांबद्दलच्या समजुती मात्र दुसऱ्यांच्या!

केसांबद्दल तक्रारी जाणवू लागल्यानंतर अनेकजण मग लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागतात. त्या समजुती, संकल्पना आपल्याला इतरांकडून समजलेल्या असतात, त्यांना देखील दुसरीकडून समजलेल्या असतात. अशा काही ऐकीव  समस्या आपण जाणून घेणार आहोत.

काही खोट्या समजुती…

१. मध डोक्यावर लागला की केस पिकतात     

लहानपणापासून कोणी चालता बोलता सहज हे वाक्य बोलून जातं पण ते वाक्य आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो तेव्हा ते खरं आहे की नाही हे पडताळून पाहत नाही. अशाच प्रकारचं हे वाक्य खूप मजेशीर आहे. याचा वापर लहान मुले सर्रास करतात.

२. उन्हात काम केलं की केस पिकतात.     

जे मजदुर किंवा कामगार असतात, त्यांची केसं तर काळी कुळकुळीत असतात. त्यामुळे “उन्हात केस पिकतात”, हे वाक्य कसे निर्माण झाले असेल याची नक्कीच दखल घेतली पाहिजे. शारीरिक कष्ट आणि योग्य रक्ताभिसरण असेल तर केसांच्या समस्या कधी जाणवत नाहीत आणि केसांकडे जास्त लक्ष पण जात नाही. 

३. टेन्शन घेतलं की केस पिकतात, गळतात.

टेन्शन हा शब्दच टेन्शन आणणारा आहे. जो काहीच करत नाही त्याला कसलेच टेन्शन नसणार मग त्याचे केस कसे पिकतात. त्याला तर काहीच टेन्शन नसते. यावरून एक पर्याय सापडतो की आपल्या अनुवांशिक रचनेनुसार केस पिकने व केस गळणे यांचा संबंध असतो.      

आजचे राहणीमान आणि प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर खूप विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. त्याचा संबंध आपण केस पिकण्याशी लावू शकतो. परंतु टेन्शन म्हणजे मानसिक दुर्बलता हेही लक्षात ठेवलं पाहिजे. एखादी समस्या किंवा कार्य आपण बुद्धीच्या जोरावर जर पार पाडलं तर होणारा आनंद हा वेगळाच असतो. त्यामुळे टेन्शन येणं हेदेखील काही अर्थी चांगलं म्हणावं लागेल परंतु टेन्शन घेणं हे मानसिक दुर्बलताच आहे. आणि त्याचा केसांशी संबंध लावणं हेही चुकीचं आहे.

४. तेल लावलं की केस उगवतात.         

जाहिरात बघणे व ती अमलात आणणे हे जणू खरेच असल्यासारखं वाटतं. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री केसांवरून हात फिरवतो आणि “असे केस हवे असतील तर वापरा हे तेल किंवा शाम्पू” असे सांगतो, परंतु तो स्वतः ते प्रॉडक्ट वापरतो का? याबाबत विचार करणे आवश्यक आहे.

तेलाच्या कंपन्या अशा बोलण्यातून मोठ्या झाल्या. एक प्रॉडक्ट एखाद्याला विकलं की झालं. त्याने त्या व्यक्तीला फायदा होतो की नाही हे त्यालाच माहीत पण कंपनीचा खूप मोठा फायदा होतो.      

वास्तविक जीवनात “हे तेल लावण्याने माझे केस गेले” असे देखील खूप जण म्हणत असतात.       

काही महत्वाचे…     

आपल्या बुद्धीची कुवत वाढवणे महत्त्वाचे आहे. केसांची कुवत आपल्या शारीरिक जडणघडण, ठेवण आणि संस्कारांवर अवलंबून असते. सौंदर्यात केसांची भर पडत असली तरी त्याचा जीवन सुंदर बनवण्याकडे काही एक उपयोग होत नाही. 

जरा हेही वाचा- “देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो” सगळ्यात मोठी अफवा!

Leave a Comment