“विसंगाशी घडो संग…” असच काहीसं झालय भाषेचंही आपल्या.

काही शब्द किंवा वाक्य आज महाराष्ट्रात अशी काही प्रचलित झाली आहेत की त्यांचा अर्थ लावणे म्हणजे बुद्धी नसल्याचा प्रत्यय येतो. किशोरवयीन वयात मनावर व अस्तित्वावर अशी काही वाक्ये कोरली जातात ज्यांचा परिणाम पुढील पिढीवर होतोच होतो.

१. पार्टी हार्ड…!

काय आहे हा शब्द! आणि याचा अर्थ काय लावायचा? आज सर्रास कोणाचा वाढदिवस असो की लग्नसमारंभ, यात्रा असो की मिरवणूक, पार्टी हार्ड म्हणजे रात्रभर जागरण करणे, दाबून दारू पिणे आणि काहीही वेडसरपणा करणे. हे सर्व तरुण वयात केलं जातं आणि परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.

२. अपना टाईम आयेगा…!

आजचे चित्रपट केवळ वासनामय आणि महत्वकांक्षी भावनेने भरकटलेले असतात. इच्छाशक्ती कोणत्याही वाईट मार्गाने प्रक्षुब्ध करून तरुणाई फक्त आणि फक्त अडचणीच निर्माण करत असते. “गल्ली बॉय” या चित्रपटातलं हे वाक्य खूप काही न सांगता केवळ विरूध्द भावनेने तरुणाईला उत्साह देत आहे. आज शालेय वयातील मुलेदेखील हे वाक्य बोलू लागलेली आहेत.

३. जय पबजी…!

ही गेम आणि हे वाक्य लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी एक व्यसन बनून गेले आहे. ही गेम एक क्रूर प्रवृत्ती जन्माला घालत आहे. गेममध्ये आपण कोणाला तरी मारत आहोत आणि त्यातून मिळणारा खोटा आनंद हा वास्तविक जीवनात एखाद्या व्यक्तीला संयमी राहू देऊ शकत नाही. लहान मुले तर “विनर विनर चिकन डिनर” आणि “जय पबजी” अशीच करत बसलेली असतात. 

४. राडा

हा शब्द अगोदर चिखलाचा राडा, पिठाचा राडा म्हणून ओळखला जायचा पण आता, जर काही विक्षिप्त, विलक्षण करायचे असेल तर “राडा राडा”, “नुसताच राडा” किंवा “राडा तर होणारच” अशी वाक्ये सहज बोलली जातात.अशा अर्थाची तर गाणी पण आलेली आहेत. त्यामुळे हा शब्द जीवन चांगले करून जात नाही, पण मूर्खपणा मात्र नक्कीच करवून जातो.
याव्यतिरिक्त टीव्ही मालिकेतील वाक्य, बोलीभाषेतील वाक्य ही खूप खोलवर परिणाम करून जातात. 

हे नक्की वाचा- केस माझे ..पण केसांबद्दलच्या समजुती मात्र दुसऱ्यांच्या!

Leave a Comment