स्वच्छता दिन – मराठी निबंध | Swachhata Din Marathi Nibandh |

प्रस्तुत लेख हा स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा स्वच्छता दिन – मराठी निबंध (Swachhata Din Marathi Nibandh) आहे. स्वच्छता दिन कधी आणि कसा साजरा केला जातो, याबद्दल सविस्तर वर्णन या निबंधात करण्यात आलेले आहे.

स्वच्छता दिन – मराठी निबंध | Swachhata Din Essay In Marathi |

प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जशी वैयक्तिक काळजी घेत असतो, तसेच आपल्या परिसराच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी आपण घ्यायला हवी. स्वच्छतेचे महत्त्व समजण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर या दिवशी “स्वच्छता दिन” साजरा केला जातो.

आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येकाचे प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे. ते योग्यरित्या पार पाडण्यासाठी स्वच्छता दिनी त्याविषयी जनजागृती केली जाते. संपूर्ण देशात हा दिवस मोठ्या उत्साहात आणि उपक्रमशील पद्धतीने साजरा केला जातो.

शाळा, महाविद्यालये, औद्योगिक संस्था तसेच विविध शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये स्वच्छता दिन अत्यंत कृतिशील पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये स्वच्छता मोहीम, सांस्कृतिक कार्यक्रम, कला क्रिडा स्पर्धा अशा उपक्रमांचा समावेश असतो.

विद्यार्थी विविध उपक्रमांद्वारे स्वच्छता हा विषय हाताळतात. स्वच्छतेचे महत्त्व, गरज आणि आवड निर्माण होण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांना आवाहन केले जाते. विविध माध्यमे जसे की सोशल मीडिया, मोबाईल फोन, दूरदर्शन आणि वर्तमानपत्रे अशा सर्वांचा वापर करून स्वच्छता मोहीम राबवली जाते.

आपल्या भारतीय संस्कृतीत वर्षानुवर्षे असा विश्वास आहे की, जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी निवास करते. स्वच्छ परिसरात रोगराई पसरत नाही. रोगराई न पसरल्याने आपोआपच आरोग्य प्राप्ती होते. आरोग्य प्राप्ती झाल्याने उत्तम जीवन जगण्यास प्रेरणा मिळत राहते.

राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी हे स्वच्छतेचे पुजारी होते. ते असे म्हणत असत की, स्वच्छता हे प्रत्येकाचे पहिले कर्तव्य आहे व ते सर्वांनी पार पाडायलाच हवे. असा महात्मा जर स्वच्छतेला एवढे प्राधान्य देत असेल तर आपणही थोड्या अंशी त्या दिशेने प्रयत्न करू शकतो.

प्रत्येकाने स्वतःपासून स्वच्छतेला सुरुवात करावी म्हणजे सुरुवातीला स्वतःला नीटनेटके ठेवून आपले घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा. देशवासीयांनी असा स्वच्छतेचा संकल्प केल्यास स्वच्छ भारत मिशन ही संकल्पना पूर्णत्वास येईल, यात शंकाच नाही.

स्वच्छता दिनीच स्वच्छतेचे महत्त्व समजणे गरजेचे नाही तर वर्षातील सर्वच दिवस स्वच्छता दिवस असले पाहिजेत, ज्यामुळे स्वच्छता आपल्या अंगी बाणवली जाईल. आपण सर्व देशवासीय मिळून संपूर्ण देश स्वच्छ आणि निरोगी बनवण्याचा संकल्प करुयात.

तुम्हाला स्वच्छता दिन – मराठी निबंध (Swachhata Din Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment