दैवी तरीही मानवी प्रतीक – श्रीकृष्ण…

ज्या गोष्टी आपल्याला उमजत नाहीत किंवा अनुभवात नाहीत त्याबद्दल न बोलने कधीही हितकारक ठरते, असा जर निकष ठेवला तर आपण काही सत्ये जाणून घेऊ शकतो. ती सत्ये आपल्या बुद्धीच्या व मनाच्या पलीकडे जाऊन अस्तित्वाशी निगडित होत जातात. माणूस जस-जसा उत्तरोत्तर शिकत जातो, तस-तसे त्याला जीवन आणखी कळत जाते.

“कृष्ण म्हणजे पूर्ण अस्तित्व, भगवंत, परमोच्च अवस्था, जीवनाची एक आनंदी अभिव्यक्ती, असे आपण फक्त लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. प्रत्येक मानवी जीवनाची ती अवस्था होऊ शकते का? असा जर प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला, तर आपले आयुष्य त्या दिशेने मार्गस्थ होऊ शकते”      

कृष्ण सगळ्याना माहित आहे तो म्हणजे एक सखा , एक प्रेमी, राजकारणी , अध्यात्मिक गुरू. प्रत्येक व्यक्तीसाठी कृष्ण हा वेगवेगळा भासत आलेला आहे. दुर्योधन व कौरव यांना तो एक मायावी पुरुष, पांडव व अर्जुन यांना तो एक गुरू,हितचिंतक तर अनेक गोपिकांना तो स्वतःचा प्रेमी, अशा विविध छटा एका व्यक्तीच्या असू शकतात? तर थोडा विचार केल्यास कळेल की आपल्याला जे हवं असतं तेच आपण दुनियेत बघत असतो. आपले पूर्ण अस्तित्व ज्या दिशेने चाललेले असते त्यासंबंधित सर्व गोष्टी आपल्याला खऱ्या वाटू लागतात आणि परिणामी तेच आपलं जीवन बनून जातं. महाभारतात तर इतक्या प्रकारच्या व्यक्ती सापडतात की सर्व मानवी अपेक्षा, ईर्ष्या, आनंद, महत्त्वकांक्षा, वासना यांचा एकत्र संगम असलेला भासतो. त्यामुळे कृष्ण इतका विविधरंगी होत गेला आहे.        

पाच हजार वर्षे उलटून देखील एखादे व्यक्तिमत्व इतके जीवंत वाटावे हा काही योग नव्हे तर प्रत्येक मानवी जीवन हे आपले सर्व अस्तित्व कृष्णावरच थोपवते. कृष्ण जिवंत असतानाही आणि आज नसतानाही. आपले जसे आयुष्य आहे किंवा आकांक्षा आहेत त्यापद्धतीनेच आपण कोणालाही जाणू शकतो, कृष्ण आपल्या बाजूने कोणतीही अपेक्षा, आकांक्षा निर्माण करत नाही याउलट ज्या व्यक्ती कृष्णाला जसे समजतात तसेच कृष्ण त्यांच्यापुढे व्यक्त होतो. जी व्यक्ती खूप आनंदी असेल त्या व्यक्तीला कृष्ण परमोच्च आनंद म्हणून जाणवला आहे. जी व्यक्ती धूर्त असेल त्या व्यक्तीला कृष्ण मायावी जाणवला आहे. जी व्यक्ती प्रेमळ असेल त्या व्यक्तीला कृष्ण प्रेमी म्ह्णून जाणवला आहे. जी व्यक्ती ज्ञानी असेल त्याला कृष्ण उत्तम ज्ञानी म्हणून तर जी व्यक्ती भक्त असेल त्या व्यक्तीला कृष्ण भगवंत म्हणून जाणवला आहे.     

व्यक्ती तशी प्रकृती, दृष्टी तशी सृष्टी, अन्न तसे मन. या म्हणी जशा प्रचलित आहेत त्या नुसार जर विचार केला तर आपण जसे तसे कृष्ण. व्यर्थपणे आपल्या देवाबद्दलच्या संकल्पना कृष्णापुढे सादर करू नये. आपले रोजचे जीवन कसे आहे? आपण कशाच्या शोधात आहोत? आणि आपण कुठल्या मार्गाने आणखी जीवनाभिमुख होऊ शकतो? याचा फक्त विचार करायचा. असे करत राहिल्यास फुकटचा विश्वास निर्माण न होता एक स्वतःबद्दल, अस्तित्वाबद्दल श्रद्धा निर्माण होईल .       

प्रत्येक क्षण जसे कृष्ण स्वतःला जाणत असतील त्याचा कधीतरी आपण अंगीकार केला पाहिजे. कृष्ण स्वतःहुन काय अनुभव करत असतील. जर ते परामावतार असतील तर ते तसाच अनुभव करत असतील. हे तर सामान्य बुद्धिला पण पटेल. आजपर्यंत आपण त्यांच्या फक्त कथा, घटना आणि त्यांचे कार्य ऐकलेले आहे. ते सर्व कार्य, घटना या दुसऱ्या व्यक्तींशी निगडित होत्या. स्वतः कृष्ण जर परम अस्तित्व असतील तर त्यांनी काय केले? काय नाही केले? काय करायला पाहिजे होते? या सर्वांचा विचार न करता, ज्या घटना त्यावेळी घडत गेल्या त्यानुसार सर्वात योग्य असा मार्गच त्यांनी निवडला असेल असासुद्धा विचार आपण करू शकतो.       

‘कृष्ण’ एक अस्तित्व म्हणून आपण जाणून घेऊ शकतो का? त्याबद्दल थोडीशी आपली जिज्ञासू वृत्ती वाढवू शकतो का? असा विचार करावा लागेल. तरच कृष्ण या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल, मुत्सद्दी राजकारण्याबद्दल, मनोरंगी प्रेमीबद्दल, सर्वोत्तम गुरुबद्दल, जिवाभावाच्या सख्याबद्दल थोडासा न्याय करता येईल. कृष्ण जसे जगले त्याचा गाभार्थ लक्षात घेऊन आपणही आपले जीवन कृतार्थ बनवू शकतो.     

कृष्ण, तथ्य म्हणून जीवन जगण्याची कला आणि सत्य म्हणून पूर्ण अस्तित्व असेच व्यक्त झाले आहेत. एक सहजच जगण्याची उर्मी देऊन जाणारा ‘कृष्णजन्माष्टमी’ हा सण सर्वांच्या जीवनात आनंदच घेऊन येईल अशी आशा. फक्त वरवर दिसणाऱ्या कृती जसे दहीहंडी फोडणे, उपवास धरणे, विविध कार्यक्रम आयोजित करणे या सर्वांमधून देखील एक निखळ आनंद शोधुया आणि या जन्माष्टमीला स्वतःचे आयुष्य कसे उदात्त बनेल याकडे लक्ष देऊया.

मराठी वाचता येतं? मग ही ५ पुस्तके तुम्हाला वाचायलाच हवीत…

Leave a Comment