प्रजासत्ताक दिन – मराठी निबंध | Republic Day Essay in Marathi |

प्रस्तुत लेख हा प्रजासत्ताक दिन – मराठी निबंध
(Republic Day Essay in Marathi) आहे. प्रजासत्ताक दिनाचे अखिल भारतासाठी असलेले महत्त्व आणि तो कशा प्रकारे साजरा केला जातो याचे विस्तृत वर्णन या निबंधात केलेले आहे. 

प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी निबंध मराठी | Prajasattak Din – Marathi Nibandh |

भारतीय प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक वर्षी २६ जानेवारी या दिवशी संपूर्ण भारतात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. भारताच्या संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाला मान्यता दिली. त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले.

भारतीय राज्यघटना अंमलात आलेला दिवस म्हणून २६ जानेवारी या दिवशी संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिना प्रमाणेच ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली जाते. भारताला एक संपूर्ण स्वतंत्र राष्ट्र म्हणून या दिवसापासून कायदेशीरदृष्ट्या चालना मिळाली. अनेक महत्त्वाचे कायदे आणि नियम आपल्या देशात लागू करण्यात आले.

दरवर्षी २६ जानेवारी दिवशी प्रत्येक शाळा – महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत असतो. यावेळी शाळांतील विद्यार्थी स्वच्छ गणवेश परिधान करून शाळेच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सामील होत असतात. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होत असते.

शाळेत विविध राष्ट्रभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले जातात. यामध्ये विद्यार्थी संचलन, देशभक्तीपर समूह गीते, उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा आदरसत्कार, मान्यवरांची भाषणे यांचा समावेश असतो. कार्यक्रमाचा समारोप करताना विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले जाते.

प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांची देशभक्तिपर घोषवाक्ये देत प्रभातफेरी काढली जाते. यामध्ये सध्या असलेल्या समस्या आणि देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या बाबींचे शाब्दिक वर्णन असते. संपूर्ण देशात इतर सरकारी आणि सुरक्षा कार्यालयांत देखील ध्वजारोहण केले जाते. रात्र होण्याअगोदर सायंकाळच्या वेळेस ध्वज उतरवणे असा नियम असतो.

दरवर्षी भारताची राजधानी दिल्लीत भव्यदिव्य व नयनरम्य असा सोहळा असतो. भारतासाठी प्राण अर्पण केलेल्या वीर जवानांना आदरांजली वाहिली जाते. त्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला जातो आणि राजपथावर संचलन केले जाते. यावेळी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसमवेत सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, आणि प्रमुख पाहुणे उपस्थित असतात.

भारतीय सुरक्षा दल संचलन आणि विविध स्वरूपाचे सांस्कृतिक संचलनाच्या सोहळ्यावेळी भारतीय राष्ट्रपती या सर्व संचलनकर्त्यांची मानवंदना स्वीकारतात. प्रत्येक राज्यात देखील अशा स्वरूपाचे संचलन होत असते, त्याची मानवंदना राज्याचे राज्यपाल स्वीकारतात.

२६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय दिन असल्याने त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. सर्व लोक आपापल्या परीने ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतात. सध्या मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध असल्याने सर्वजण प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा संदेश सोशल मीडियावर पाठवत असतात.

तुम्हाला प्रजासत्ताक दिन हा मराठी निबंध (Republic Day Essay in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment