मोबाईलची आत्मकथा मराठी निबंध | Mobilechi Atmkatha Marathi Nibandh |

मोबाईल स्वतः आपल्याशी संवाद साधत आहे अशा कल्पनेचे सविस्तर वर्णन करून विद्यार्थ्यांनी मोबाईलची आत्मकथा हा निबंध (Mobilechi Atmkatha Marathi Nibandh) लिहायचा असतो.

मोबाईल सतत वापरला जातो, काही वर्षांनी जुना होत असतो. माणसाला त्याची सवय होत जाते. पुन्हा बिघडला की नवीन मोबाईल घेतला जातो. या सर्व घटना आणि फायदे – तोटे यांचे विश्लेषण मोबाईल स्वतः सांगू लागला तर निबंधासाठी एक छान विषय तयार होऊ शकतो.

मोबाईलची आत्मकथा | Mobilechi Atmkatha Marathi Nibandh |

मोबाईलचे चार्जिंग संपत आले होते. मोबाईल बंद होऊ नये म्हणून त्याला टेबलवर ठेवून वर्तमानपत्र वाचत बसलो. तेवढ्यात अचानक काही वाक्ये कानावर पडली. “का रे, थकलास का? आज एवढाच वापर!” मी तर अचानक थबकलो. चक्क शेजारी टेबलावर ठेवलेला मोबाईल माझ्याशी संवाद साधत होता. मी काहीही न बोलता फक्त ऐकत होतो.

तो पुढे बोलू लागला. मी जेव्हा तयार झालो तेव्हा मला की पॅड असायचे. आत्ता देखील काही मोबाईलला ते उपलब्ध आहे. परंतु बहुतांश लोकांना स्क्रीन टच हवा असतो. माझा विकास देखील तसाच होत गेला आहे. की पॅड ते स्क्रीन टच!

माणसाने तंत्रज्ञान विकसित केले. मला आणि माझ्यासारखी अनेक उपकरणे बनवली. माझा उपयोग दूरवर असलेल्या माणसांशी संवाद साधण्यासाठी होऊ लागला. सुरुवातीला मेसेज किंवा कॉल एवढाच काय तो माझा उपयोग होता. परंतु आजचा माझा उपयोग हा माणसाचे सर्वस्व बनत चालला आहे.

आज एकही व्यक्ती असा दिसणार नाही जो माझा वापर करत नाही. त्यामध्ये मी आता स्मार्ट देखील झालो आहे आणि इंटरनेटमुळे मला अतिमहत्त्व प्राप्त झाले आहे. सोशल मीडिया, माहिती शोध यंत्रणा, व्हिडिओ कॉलिंग असे विविध पर्याय उपलब्ध झालेले आहेत.

मला हे सर्व पुन्हा सांगावे लागत आहे कारण मी स्मार्ट बनलो आहे, माझे फायदे तर आहेतच शिवाय तोटेही आहेत. कोणी जर जाणीवपूर्वक माझा उपयोग केला तर त्याचे आयुष्य मी अतिशय सुखकर बनवतो. याउलट माझा उपयोग जर अति प्रमाणात झाला तर मात्र मी नुकसानकारक ठरतो.

माझी बनावट सर्व इलेक्ट्रॉनिक आहे. त्यामुळे माझ्यातुन बाहेर पडणारी किरणे ही मानवाच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. विशेष करून डोळे, त्वचा, आणि मेंदूसाठी ती नुकसानकारक आहेत. माझा अतिवापर हा मानवाला आळशी आणि निरुत्साही बनवू शकतो.

तुझा वापर देखील जास्त होत आहे. मागील वर्षीच बघ तुला चष्मा लागला. सोशल मीडिया आणि इंटरनेट वापरामुळे तुला वास्तविक जगाचे भान राहिले नाहीये. तुझी चिडचिड वाढलेली आहे. सतत मान झुकवून तू चालत असतोस. चालताना देखील माझा वापर करत असतोस.

सर्व वैशिष्ट्ये आणि सुविधांचा तू नक्की वापर कर परंतु त्यांच्या आहारी जाऊ नकोस. तुझे वय आत्ता खूप कमी आहे. अजुन तू विद्यार्थी आहेस. तू तुझ्या करिअरकडे लक्ष्य द्यायला हवं. मला माझे मत तुझ्यापुढे खूप दिवस झाले व्यक्त करायचं होतं पण आजच वेळ भेटला तेही तू मला बाजूला ठेवून वर्तमानपत्र वाचायला घेतलंस म्हणून!

आज मोबाईल बँकिंग, संदेश पोचवणे, व्हिडिओ कॉल, जगातील कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधणे, प्रसिध्द व्यक्तींच्या संपर्कात राहणे हे माझ्यामुळे अति सोयीस्कर झाले आहे. माझे फायदे आणि उपयोग लक्षात घेऊन माझा व्यवस्थित वापर हेच मानव जातीसाठी भविष्यात हितकर असेल.

मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्या वापराचे फायदे, तोटे आणि भविष्यातील संधी ओळखून माणूस वागला तरच जगण्यात सुव्यवस्था नांदेल. या सर्व बाबींचे भावी परिणाम आणि सद्यस्थिती पाहूनच मला आज माझी आत्मकथा तुला सांगावीशी वाटली.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला मोबाईलची आत्मकथा हा निबंध (Mobilechi Atmkatha Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment