Mithali Raj Story | मिताली राज – महिला क्रिकेटपटू संपूर्ण माहिती !

सलग सात अर्धशतके झळकावण्याचा विक्रम करणारी मिताली राज हिच्याबद्दल आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जिद्द, चिकाटी आणि अपार मेहनत घेण्याची तयारी प्रत्येक खेळाडूने दाखवली तर देशाकडून खेळण्याचे स्वप्न साकार होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महिला क्रिकेटपटू मिताली राज. मिताली राज ही खेळाडू जगप्रसिद्ध आहे तसेच उत्तम आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून देखील प्रसिद्ध आहे. आपल्या असंख्य चाहत्यांना कधीही आपल्या खेळाने निराश न करणारी मिताली म्हणजे सातत्यपूर्ण खेळाची मशालच म्हणावी लागेल.

मिताली राजचे वडील वायुसेनेत कार्यरत आणि नंतर बँकेत अधिकारी होते. घरात नेहमी शिस्त असायची. मिताली मात्र थोडी आळशी होती. शाळेत जायच्या अगोदर अर्धा तास उठणारी मिताली क्रिकेट अकॅडमीमध्ये भरती झाल्यानंतर स्वतःचा आळस दूर सारत क्रिकेटलाच आपले आयुष्य बनवते. लहानपणापासून क्रिकेट खेळताना संयम आणि स्थिरता तिने अंगी बाणवली होती. ते गुण आपल्याला तिच्या खेळातून जाणवतात. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक नवनवीन विक्रम प्रस्थापित करत ती “महिला सचिन तेंडुलकर” म्हणून ओळखली जाऊ लागली. तिच्या विश्वविक्रमी खेळामुळे अनेक मुली क्रिकेटकडे वळू लागल्या आहेत.

मिताली राज यांचा जन्म ३ डिसेंबर १९८२मध्ये राजस्थानात जोधपूर येथे झाला. नंतर संपूर्ण कुटुंब हैदराबाद येथे स्थित झाले. नृत्याची आणि क्रिकेटची आवड असलेली मिताली राज हिने नंतर आपले करिअर क्रिकेटमध्येच घडवले. लहानपणापासूनच मिताली राज हि आपला भाऊ आणि इतर मुलांसोबत सराव करत असे. मिताली यांना क्रिकेटमधील योगदानासाठी अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण होण्यापूर्वी तिला भरतनाट्यम आवडायचे. मोठी भरतनाट्यम नर्तिका होण्याचे तिचे स्वप्न होते. मंचावर अनेक वेळा नृत्य सादरीकरण देखील केले होते. एकदा नृत्य की क्रिकेट दोन्हीपैकी एक निवडण्याची संधी आली तेव्हा तिने क्रिकेटला पहिली पसंती दिली. क्रिकेट जर खेळत नसती तर नक्कीच भरतनाट्यम नर्तिका झाले असते. असे तिने तिच्या मुलाखतीतून अनेक वेळा सांगितले आहे.

ती तिच्या यशामागचे श्रेय वडिलांना देते. भारतीय संघात खेळावे असे तिच्या वडिलांना नेहमी वाटत असे. लहानपणापासून त्यांनी याच गोष्टीची काळजी करून सराव करवून घेतला होता. केवळ १४ व्या वर्षी तिने भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून जागा मिळवली आणि १६ व्या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा सामना २६ जुन १९९९ रोजी खेळण्यात आला ज्यामध्ये तिने ११४ धावांची शानदार खेळी केली आणि भारताने हा सामना १६१ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर भारतीय महिला क्रिकेटला एक नवीन सुपरस्टार खेळाडू मिळाली होता. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करण्याचा विक्रमदेखील मिताली राज यांच्या नावावर आहे.

मिताली राज यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा अनेक जणांना माहीत सुद्धा नव्हते की महिला क्रिकेट देखील खेळतात. अशा परिस्थितीतून स्वतःला प्रोत्साहित करत त्यांनी न डगमगता क्रिकेट खेळणे चालूच ठेवले. उत्तम गुणवत्ता, कौशल्य असल्यामुळे संघाच्या कर्णधारपदी देखील त्यांची निवड झाली. कर्णधार म्हणून त्यांनी सर्व खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेतली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी जवळजवळ ५० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. नितु डेविड ही तिची सर्वकालीन आवडती खेळाडू आहे. अनेक विक्रम करणारी मिताली राज यांची तुलना सचिन तेंडुलकरशी जेव्हा केली जाते यावर त्या खूप आनंदी होतात अनेक वेळा त्यांनी असे उत्तर दिले आहे की सचिन तेंडुलकरचे योगदान क्रिकेट मध्ये खूप उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे जेव्हा अशी तुलना केली जाते ती तुलनाच त्यांना चांगला खेळ करण्यासाठी प्रेरणा देते.

वडिलांना क्रिकेटचे ज्ञान असले तरीही ती आईलाच स्वतःचे प्रेरणास्थान मानते. मानसिक दुविधा किंवा संकटाला तोंड देण्यासाठी ती आईचाच सल्ला घेते. खेळात प्रत्येक खेळाडूला मानसिकदृष्ट्या खंबीर असणे आवश्यक आहे. खेळात राजकारण नसले पाहिजे. अनेक गुणवंत खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे असे तिचे वैयक्तिक मत आहे.

ती क्रिकेट खेळायला लागल्यापासून संयम आणि स्थिरता तिच्या वास्तविक जीवनाचा देखील अविभाज्य भाग होऊ लागला आहे. त्यामुळे संयम, स्थिरता आणि सातत्य हेच स्वतःच्या यशामागचे सूत्र असल्याचे ती मानते. महिलांना जर भारतीय संघातर्फे खेळायची इच्छा असेल तर त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत केली पाहिजे. कष्टाशिवाय यश प्राप्त होऊच शकत नाही असे त्यांचे प्रामाणिक मत आहे.

क्रिकेट करीअर –

एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिताली २०९ सामने खेळली आहे ज्यामध्ये तिने ५० च्या सरासरीने ६८८८ धावा जमवल्या आहेत. १२५ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे.

मिताली ने १० कसोटी क्रिकेट सामन्यातून ५१ च्या सरासरीने ६६४ धावा जमवल्या आहेत. ज्यामध्ये २१४ ही तिचा सर्वोच्च धावसंख्या आहे.

टी – २० क्रिकेट मध्ये ८९ सामन्यातून ३८ च्या सरासरीने २३६४ धावा जमवल्या आहेत ज्यामध्ये ९७ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे.

Leave a Comment