गुरूचे महत्त्व – मराठी निबंध | Guruche Mahattv Marathi Nibandh |

जीवनातील गुरूचे स्थान अढळ असते. ते कोणीही हिरावू शकत नाही. विद्यार्थ्यांना गुरुबद्दल कृतज्ञता आणि आदराची जाणीव होण्यासाठी गुरूचे महत्त्व (Guruche Mahattv Marathi Nibandh) हा निबंध लिहावा लागतो. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!

गुरूचे महत्त्व | Guruche Mahattv Essay In Marathi |

भारतीय संस्कृतीत गुरु हा शिर्षस्थानी मानला गेला आहे. प्रत्येक धार्मिक ग्रंथ गुरु हाच सत्य जाणण्याचा मार्ग आहे असे सांगतो. गुरूला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण एका व्यक्तिमत्त्वा पलिकडे जाऊन गुरु सर्वांची काळजी करत असतो. गुरु जे सत्य जाणतो ते सत्य सर्वांना उपलब्ध व्हावे असे त्याला मनोमन वाटत असते.

मानवी जीवनाचा उद्देश्य आणि शक्यता यांचा विचार केल्यास गुरूचे महत्त्व आपल्याला कळून येईल. माणूस आयुष्यात जे काही करत असतो त्याचा संबंध कुटुंबाशी आणि समाजाशी येतच असतो शिवाय माणसाचे व्यक्तिगत आयुष्यही त्यामुळे घडत असते.

मानवी जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी बनावे असे सर्वांनाच वाटत असते पण त्याचा मार्ग कोणालाच माहीत नसतो. आपापल्या परीने सर्वजण आयुष्य सुखी बनवण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यामध्ये ते यशस्वी होत नाहीत आणि वेगवेगळ्या परिस्थितीत अडकत जातात.

मानवी सर्व समस्या आणि प्रश्नांचे उत्तर गुरु जवळ असते. खरा गुरु जाणू शकतो की कोणता व्यक्ती कोणत्या समस्येने ग्रस्त आहे आणि त्यावर काय उपाय असू शकेल. गुरूचे काम फक्त शिकवणे आणि मार्गदर्शन करणे नसते तर व्यक्तीचे जीवन अंतर्बाह्य बदलले पाहिजे, त्यासाठी तो प्रयत्नशील असतो.

गुरूला आपल्या संस्कृतीत देव मानले गेले आहे. गुरुमुळेच आपल्याला खऱ्या अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. परंतु गुरूची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला संपूर्ण समर्पण करणे गरजेचे आहे. शिष्यत्व पत्करणे गरजेचे आहे.

गुरु करेल तेच बरोबर असे वरचेवर न मानता खरोखर तो मार्ग चालून बघावा लागतो. तसे जीवन बनवावे आणि जगावे लागते. तरच आपल्याला एका नवीन जीवनाची दिशा मिळू शकेल. त्यामुळे शिष्यच गुरु निर्माण करत असतात किंवा शिष्यत्व पत्करले की गुरु उपलब्ध होतोच.

सर्वप्रथम आपण जाणले पाहिजे की गुरु म्हणजे शिक्षक नव्हे. शिक्षक फक्त आपल्याला पुस्तकी म्हणजे उधार ज्ञान देत असतो. गुरु हा अनुभवयुक्त ज्ञान देत असतो. आपल्या स्वभावात आणि जगण्यात वास्तविक फरक पडला पाहिजे असा गुरूचा उद्देश्य असतो.

मानवी शक्यता असिमीत आहेत. माणूस जे मनातून इच्छितो तेच प्राप्त करत असतो. त्यामुळे वासना व दुर्व्यवहार अशा मार्गांनी जीवन जगल्यास दुःखच प्राप्त होते तर करुणा आणि प्रेमयुक्त जगल्यास आनंद प्राप्ती होते. त्यामुळे दोन्हीही मार्गांत फरक जाणवून देण्याचे काम गुरु मार्फत होत असते.

गुरूचे जीवन देखील सर्व मानव जातीसाठी समर्पित असते. गुरुमुळे कधीच कोणाचे नुकसान होत नाही तर सर्वांचा फायदाच होत असतो. तो फायदा आंतरिक अनुभूती आणि जीवनाची परमोच्च गती अशा स्वरूपाचा असतो. त्यामुळे गुरु हाच ब्रम्ह, गुरु हाच विष्णु, गुरु हाच महेश, आणि गुरू हाच साक्षात परब्रम्ह असे म्हटले गेले आहे.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला गुरूचे महत्त्व हा मराठी निबंध (Guruche Mahattv Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Leave a Comment