दारूचे दुष्परिणाम मराठी निबंध ! Daruche Dushparinam Marathi Nibandh |

दारूचे व्यसन हे मानवी शरीरासाठी योग्य नसते. दारूमुळे अनेक अडचणींचा सामना तर करावाच लागतो शिवाय स्वतःचा वेळ आणि ऊर्जा देखील वाया जात असते. क्षणिक सुख किंवा स्वतःचा विसर या प्रामुख्याने घडणाऱ्या गोष्टी माणसाला वरवरचं सुख देऊन जातात पण त्यानंतरची येणारी उदासीनता ही कोणीच नाकारू शकत नाही.

दारूचे दुष्परिणाम निबंध लिहताना दारूचा प्रचार, आरोग्याचे नुकसान, कालांतराने न सुटणारी दारूची सवय आणि अन्य तोटे लक्षात ठेवावे लागतात. हा निबंध म्हणजे दारूच्या समस्येचे निरीक्षण आणि निराकरण कसे करावे याचे विश्लेषण करायचे असते. चला तर मग पाहुयात, कसा लिहायचा दारूचे दुष्परिणाम हा निबंध (Daruche Dushparinam Marathi Nibandh).

दारूचे दुष्परिणाम निबंध | Effects Of Alcohol Essay In Marathi |

माणूस अनेक पद्धतीने स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करत असतो. कुठल्याही प्रकारचे व्यसन एकदा का जडले की माणूस त्या व्यसनाचा गुलाम बनत जातो. व्यसन हे अनेक प्रकारचे असू शकते. ज्या ज्या वाईट सवयी स्वतःला जडलेल्या आहेत त्या एकप्रकारे व्यसनच आहेत. अशाच प्रकारचे एक भयानक व्यसन म्हणजे दारूचे व्यसन!

दारूचा संबंध खूप पुरातन काळापासून आहे. ऐतिहासिक साहित्य आणि त्यापेक्षाही पूर्वी राजे महाराजे यांच्या काळात दारूचे संदर्भ आलेले आहेत. आनंद आणि क्षणिक सुख यामधला फरक स्पष्ट होत नसल्याने किशोरवयात किंवा तरुण वयात दारूचे व्यसन जडते आणि आयुष्यभर त्याचा पाठलाग सुटत नाही. आपल्या आसपासचा समाज जर दारूचे व्यसन एकदम सहज करत असेल तर त्याचे अनुकरण करताना किशोरवयीन मुलांना काहीच गैर वाटत नाही. घरीच जर वडील मंडळी कधी दारू पिऊन येत असेल तर मग पुढच्या पिढीला देखील हे व्यसन जडू शकते.

आज तंत्रज्ञान, मोबाईल, आणि संगणक दुनियेत दारूचा प्रसार खूप विलक्षण पद्धतीने केला जातो. आपण जे चित्रपट, मालिका पाहतो त्यामध्ये दारू पिणे, मौजमजा करणे आणि इतरांना त्रास देणे यातच एखादा मनुष्य खरे आयुष्य जगत आहे असे चुकीचे दृश्य उभे केले जाते. कधी प्रेमभंग झाला, कधी संकट उभे राहिले तरी दारू प्यायची आणि खूप आनंदी असल्यावर देखील दारू प्यायची, असा गैरसमज वाढीस लागतो.

दारू पिणे चांगले की वाईट? हे त्याचे परिणाम अनुभवल्यानंतरच कळू शकेल. आनंदाच्या आणि सुखाच्या शोधात आपण आपल्या शरीराची हेळसांड करू लागतो. स्वतःच दुर्बल आणि अशक्त बनत जातो. मग काही काळ लोटल्यानंतर कळू शकेल की मानसिक तणाव, अवास्तव भीती, आणि शारीरिक दुर्बलता याव्यतिरिक्त कशाचीच प्राप्ती झाली नाही. परिणाम जर वाईटच असतील तर मनुष्य दारू पिणे का सोडू शकत नाही? याचा विचार नक्कीच झाला पाहिजे.

ज्या ज्या गोष्टींतून क्षणिक सुख मिळते आणि ज्यांचे भावी परिणाम वाईट असतील अशा गोष्टींकडे मन आकर्षिले जाते. माणसाच्या वासना आणि कामना जर खूपच प्रबळ असतील तर मग व्यसन केल्याशिवाय आणि काही वेळ वेडे बनल्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच मग मज्जा, आयुष्य एन्जॉय करणे असे तर्क दिले जातात. पण वेडेपणातून कोणीच प्रसन्न, बुद्धिमान आणि सरस बनू शकत नाही.

दारू पिल्यानंतर मनुष्य स्वतःची सजगता हरपून बसतो. त्याला आसपासचे काहीही भान उरत नाही. असा व्यक्ती सुरुवातीला मौजमजा करीत असल्याचे दाखवत असतो परंतु मानसिक अस्थिरता आणि वैफल्य तो अनुभवत असतो. थोड्या दिवसानंतर पुन्हा तसेच क्षणिक सुख म्हणून पुन्हा दारू पितो. त्यानंतर त्याला सवयच होऊन जाते. त्या सवयीतून बाहेर पडणे मग अशक्य वाटू लागते कारण त्याच सुखाची जाणिव सतत होत राहते आणि मग दारूचे सेवन केले जाते.

दारू पिल्याने वेळ आणि बुद्धी (विचार) यापासून व्यसनी व्यक्तीला काही वेळ सुटका मिळते. परंतु जेव्हा तो नशेच्या तंद्रेतून जागा होतो, तेव्हा मात्र शारीरिक आणि बौद्धिक ताण त्याला जाणवत असतो. त्यामुळे सुरुवातीला वाटणारे सुख हे कायम स्वरूपाचे दुःख कसे काय बनून जाते हे देखील त्याला समजत नाही. कष्टप्रद जीवन आणि सजगतेची कमतरता सातत्याने त्याला जाणवत राहते.

दारूचा प्रसार आणि प्रचार यापासून तरुण पिढीला परावृत्त केले पाहिजे. चित्रपट, टीव्हीमधून दाखवले जाणारे उनाड आणि बीभत्स दारूचे चित्रण किती खोटे आहे हे समजावून सांगितले पाहिजे. सवय लागलेल्या व्यक्तीने इतर चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत तरच व्यक्ती आणि समाज दारूच्या व्यसनापासून दूर राहू शकेल. दारूचे फायदे काहीच नाहीत तर दूरवर पसरणारी अशांतताच जास्त आहे. त्यामुळे दुष्परिणाम जाणून घेऊन दारूपासून आणि इतर नशेच्या पदार्थांपासून नक्की दूर राहा.

तुम्हाला दारूचे दुष्परिणाम मराठी निबंध ( Daruche Dushparinam Essay In Marathi ) कसा वाटला? त्याबद्दल नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा…

Leave a Comment