मोबाईलचे दुष्परिणाम – मराठी निबंध | Mobileche Dushparinam Marathi Nibandh |

प्रस्तुत लेख हा मोबाईलचे दुष्परिणाम (Mobileche Dushparinam Marathi Nibandh) या विषयावर मराठी निबंध आहे. या निबंधात मोबाईल वापराचे दुष्परिणाम सांगण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी दुष्परिणाम समजून घेऊन मोबाईलचा अगदी माफक आणि गरजेसाठी वापर करणे अत्यावश्यक आहे.

मोबाईल वापराचे परिणाम – निबंध | Mobile Disadvantages Essay in Marathi |

आजचे युग हे तंत्रज्ञान युग आहे असे म्हणता येईल. या काळात यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक संसाधनांचा वापर वाढलेला आहे. संगणक, टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईल या वस्तू तर रोजच्या वापरातील बाबी झालेल्या आहेत. परंतु त्यांच्या अतिवापरामुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम जाणवू लागलेले आहेत.

सध्या इंटरनेटच्या वापराने मोबाईलवर सर्व प्रकारची माहिती आणि सुविधा पुरवल्या जात आहेत. त्या सुविधांचा लाभ घेणे आणि माहिती मिळवणे यामुळे मोबाईल अतिप्रमाणात हाताळला जात आहे. त्याशिवाय एकमेकांशी संपर्क साधणे, व्हिडिओ कॉल करणे या बाबी देखील नित्यनेमाच्या झालेल्या आहेत.

मोबाईल ही इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने त्यामधून अतिनील किरणे बाहेर पडत असतात. मोबाईल स्क्रीन देखील प्रकाशित असल्याने आणि त्यामध्ये सतत आपण बघत राहिल्याने डोळ्यांवर विपरीत परिणाम जाणवू लागलेले आहेत.

मोबाईल वापरताना देखील आपल्याला मान आणि पाठ खाली झुकवावी लागत असल्याने मणक्याचे दुखणे देखील वाढलेले आहे. तसेच त्वचाविकार, हातांच्या स्नायुंची संवेदना कमी होणे, अनिद्रा, सततची भीती – चिंता असे इतर परिणाम देखील डोके वर काढू लागलेले आहेत.

माणसाचे सर्व लक्ष मोबाईल वेधून घेत असल्याने मार्केटिंग कंपन्यांनी त्याचा लाभ घेत ऍप्लिकेशन्स, विविध गेम्स आणि सोशल मीडिया म्हणून एका वेगळ्याच दुनियेचा शोध लावलेला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे माणूस वास्तविक उत्साही आणि आनंदी न राहता एका काल्पनिक दुनियेत जगू लागलेला आहे.

अनेक प्रकारचे सर्व्हे आणि वैद्यकीय संशोधनाने असे आढळले की सरासरी तीन ते चार तास मोबाईल वापरल्याने मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतात. माणसाची संवेदना, स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होऊ शकते. मोबाईलची सततची सवय ही कालांतराने व्यसन बनू शकते. त्यामुळे माणूस सतत चिंताग्रस्त राहू शकतो.

सध्या बँकिंग, शिक्षण, ऑनलाईन बुकींग, गेमिंग, सोशल मीडिया अशा विविध प्रकारच्या सेवांचा लाभ मोबाईलवर घेता येणे शक्य असल्याने सहजासहजी कोणी मोबाईलचा वापर टाळू शकत नाही. परंतु त्यावर नियंत्रण ठेवणे मात्र शक्य आहे.

मोठ्या लोकांना विपरीत लक्षणे दिसू लागल्यावर ते लोक मोबाईलचा वापर कमी करू शकतील परंतु लहान आणि किशोरवयीन मुलांसाठी मात्र मोबाईलचा वापर टाळणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोबाईलचे मानसिक आणि शारीरिक परिणाम नकळत होणारच आहेत.

भविष्यात मोबाईलचा वापर वाढतच जाणार आहे. त्यामुळे दुष्परिणाम देखील वाढणार आहेत. त्याचा वेळीच विचार झाला नाही आणि काही ठोस उपाय योजना आखल्या गेल्या नाहीत तर व्यक्तीला आणि मोठ्या स्तरावर संपूर्ण समाजाला त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील.

तुम्हाला मोबाईलचे दुष्परिणाम हा मराठी निबंध (Mobileche Dushparinam Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा… धन्यवाद!

Leave a Comment