छत्रपती शिवाजी महाराज भाषण | Shivaji Maharaj Marathi Bhashan |

प्रस्तुत लेखात छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भाषण (Chhatrapati Shivaji Maharaj Bhashan) देण्यात आलेले आहे. त्या भाषणाचा उपयोग तुम्ही शाळेत तसेच वक्तृत्व स्पर्धेत करू शकता.

छत्रपती शिवाजी महाराज या भाषणाची सुरुवात आणि शेवट समर्पक असावा, तसेच त्यांच्या जीवनाचे वर्णन वास्तविक आणि प्रासंगिक करावयाचे असते. चला तर मग पाहुयात कसे असावे/करावे भाषण!

राजा शिवछत्रपती भाषण | Chhatrapati Shivaji Maharaj Speech In Marathi |

शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |
शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे ||
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||

समर्थांच्या या ओळी शिवरायांची महती स्पष्ट करतात. त्यांच्या कर्तृत्वाची आणि दातृत्वाची उंची दाखवून देतात. आज साडे तीन शतके व्यतित झाल्यानंतरही छत्रपतींचे स्मरण तिळमात्रही कमी होत नाहीये. त्यांच्या जीवनावर भाषण करणे म्हणजे माझेच नाही तर ते भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांचे देखील सौभाग्य आहे.

युगपुरुष, स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, छत्रपती अशा एक ना अनेक उपाधी ज्या महापुरुषाला प्राप्त झाल्या आहेत ते दुसरे तिसरे कोणीही नसून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले आहेत. शून्यातून स्वराज्य निर्मिती करणारे शिवराय हे संपूर्ण देशासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श आणि प्रजादक्ष राजा मानले गेले आहेत.

अशा या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्वाचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे मालोजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते.

शिवरायांचे बालपण राजमाता जिजाऊ यांच्या सानिध्यात गेले. शहाजीराजे स्वतः सरदार असल्याने त्यांचे साथीदार ही तेवढेच कुशल, हुशार आणि लढाऊ वृत्तीचे होते. राजमाता जिजाऊ आणि इतर विश्वासू कर्तबगार मंडळी यांचे सानिध्य सतत शिवरायांना लाभत असल्याने त्यांचे व्यक्तित्व हे चांगल्या संस्कारांनी भारले गेले.

राजमाता जिजाऊ स्वतः शिवरायांना रामायण, महाभारत तसेच इतर वीर पुरुषांच्या कथा सांगत असत. त्यानुसार त्यांचे विचारही त्या दिशेने पराक्रमी बनण्याचे पक्के होत गेले. शहाजीराजे सरदार असल्याने सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत. अशा सर्व शिकवणीमुळे बाल शिवाजी हे मोठेपणी छत्रपती बनू शकले.

आदिलशाही, निजामशाही, आणि मुघल या सत्तांविरोधात शिवरायांनी आपली मोहीम राबवली. मावळे, विश्वासू कर्तबगार साथीदार, आणि आई भवानीचा आशीर्वाद सोबत घेऊन या सत्तांविरोधात जबरदस्त लढा दिला. सुरुवातीला पुणे प्रांत जिंकत त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न हळूहळू सत्यात उतरवायला सुरुवात केली.

अफजलखान स्वराज्यावर चालून आलेला असताना त्याचा बंदोबस्त अत्यंत युक्तीने करून शिवरायांनी आपली बुद्धीची चुणूक दाखवली. त्याप्रमाणे “शायीस्ते खानाची बोटे कापणे”, “आग्र्याहून सुटका”, “पुरंदरचा तह” अशा प्रसंगांत शिवराय किती पराक्रमी, संयमी, आणि अढळ होते हे दिसून येते.

स्वराज्य निर्मितीच्या स्वप्नात अनेक मावळे शिलेदारांनी शिवरायांसाठी स्वतःचे प्राण अर्पण केले. आदिलशाही, निजामशाही, आणि मुघल या तिन्ही सत्तांनी शिवरायांचे अस्तित्व मान्य केले होते. आता रयतेचा विचार करून त्यांचे हित जपणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले. इ. स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला.

राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वराज्याचे स्वतंत्र चलन सुरू केले. “प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे.” असा अर्थ असणारे राजमुद्रेवरील संस्कृत सुभाषित खालीलप्रमाणे,

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

शिवरायांनी आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. स्वराज्याचा पहिला छत्रपती म्हणून शिवराय हेच रयतेकडून सर्वमान्य झाले होते. शिवरायांची गाथा संपूर्ण भारत वर्षात दुमदुमत होती. अशा या वीर पुरुषाची प्राणज्योत अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी मालवली.

संपूर्ण जीवन एक धगधगती ज्वाला आणि संघर्ष बनवणारा, स्वराज्य निर्मितीसाठी आणि लोकहितासाठी स्वतःचे जीवन पणाला लावणारा असा नरवीर, पराक्रमी, राष्ट्रपुरुष छत्रपती महाराष्ट्र भूमीत जन्माला आला आणि मातृभूमी धन्य करून गेला. असा राजा पुन्हा होणे नाही. राजा शिवछत्रपती एकच होता, एकच आहे आणि एकच राहील. अशा या युगपुरुषाचे संस्मरण अनंत काळापर्यंत होत राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!

शिवरायांचे जीवन ( Life Of Shivaji Maharaj ) शाब्दिक स्वरूपात व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज भाषण (Shivaji Maharaj Bhashan) कसे वाटले, याबद्दल नक्की कळवा.

Leave a Comment