Essay On Swachha Bharat Abhiyan in Marathi | स्वच्छ भारत अभियान – निबंध!

स्वच्छ भारत अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे ज्यामध्ये भारत एक स्वच्छ आणि निरोगी राष्ट्र म्हणून उदयास येणे गरजेचे आहे असा संदेश आहे. महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने जाहीर केलेले हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी दाखवला आहे. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून आपले घर, परिसर, गाव, शहर सर्व काही स्वच्छ ठेवण्याचे काम व जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. विद्यार्थ्यांना या बाबतीत अधिक माहितीसाठी आणि भविष्यातील त्यांच्या पुढाकारासाठी शालेय जीवनात स्वच्छ भारत अभियान या विषयावर निबंध लिहायला लावतात.

स्वच्छ भारत अभियान ( Swachha Bharat Abhiyan ) हा निबंध कसा लिहावयाचा ते पाहूया. मुद्देसूद रचना आणि लिहताना वाहवत न जाणे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.

Swachha Bharat Abhiyan Essay in Marathi | स्वच्छ भारत अभियान निबंध!

स्वच्छता राखणे आणि निरोगी राहणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. व्यक्ती स्वच्छ आणि निरोगी असेल तरच स्वतःबरोबर समाजाचा पर्यायाने देशाचा विकास घडवून आणू शकतो. स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेऊन प्रत्येकाने संकल्प करणे गरजेचे आहे की देश आणि समाज, कुठेही कचरा आढळला तर मी तो स्वतः दूर करून तो परिसर स्वच्छ करेन!

एखादे राष्ट्र जेवढे प्रगत होत गेलेले आहे तेवढेच स्वच्छतेबाबत जागृत होत गेलेले आहे. स्वच्छता राखणे हे नैतिक कर्तव्य आत्ताच्या काळातील गरज बनून गेले आहे. लोकसंख्यावाढ होत असल्याने निसर्गाची लयलूट होत आहे. अशातच स्वच्छता राखली न गेल्याने आणखीनच सामाजिक स्तर बिघडताना दिसून येतो.

भारताला जर आपण प्रगतीच्या वाटेवर नेत असू किंवा तसा विचारदेखील करत असू तर आपले आद्य कर्तव्य परिसर स्वच्छता असले पाहिजे. अशा उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीवेळी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली.

सर्व सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमाची दखल घेतली जात आहे. या मोहिमेचा प्रमुख उद्देश सर्व गावे आणि शहरे हागणदारी मुक्त ( ओपन डेफकेशन फ्री ) करणे तसेच सर्व पायाभूत सुविधा प्राप्त करून देऊन त्यांची स्वच्छता राखणे असा आहे. आज भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगतीपथावर असताना स्वच्छतेबाबत मात्र सर्व स्तरांवर जागरूकता दिसून येत नाही. ती जागरूकता या मोहिमेमुळे शक्य होईल असा विश्वास सर्वानाच आहे.

गांधीजींना स्वच्छता खूप आवडत असे. ते स्वतः झाडू घेऊन परिसराची स्वच्छता करत असत. स्वच्छतेबाबतचे गांधीजींचे स्वप्न आपण साकार केले पाहिजे. राष्ट्रपिता जेव्हा एखादी गोष्ट आग्रहाने सांगतात तेव्हा त्याचे वहन होणे गरजेचे आहे. “क्लीन इंडिया” असा स्वच्छतेचा संदेश आणि तशी मोहीम पुन्हा राबवली गेली पाहिजे अशा उद्देशाने स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले आहे.

“एक कदम स्वच्छता की ओर” आणि “क्लीन इंडिया ग्रीन इंडिया” असे जयघोष या अभियानात दिले गेले आहेत. सर्व शालेय संस्था, सामाजिक संस्था आणि सरकारी संस्था या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. स्वतः झाडू घेऊन परिसरात अस्वच्छता असल्यास तो परिसर स्वच्छ करणे असे कर्तव्य मानून प्रत्येक जण झटत आहे.

पर्यटन क्षेत्रात भारत देश मानाचे स्थान प्राप्त करू लागला आहे. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता आढळत असल्याने विदेशी पर्यटक लाखो संख्येने भारतात ये-जा करत असतात परंतु इथे आल्यावर दिसणारे अस्वच्छतेचे दृश्य काही प्रशंसनीय नसते. त्यामुळे आपल्याला तसेच विदेशी लोकांना हा देश आवडण्यासाठी प्रथमतः स्वच्छता महत्त्वाची आहे.

प्रत्येक घरी शौचालय असणे व त्याचा वापर करणे आता बंधनकारक आहे. या मोहिमेअगोदर एका परीक्षणानुसार भारतात असंख्य कुटुंबे शौचालयाविना आहेत असे धक्कादायक सत्य समोर आले. तसेच स्वच्छतेबाबत जागरूकताही कमी दिसून आली. या दोन बाबी पूर्णत्वास गेल्यास भारत अन्य प्रगत राष्ट्रांशी खांद्याला खांदा मिळवून काम करू शकतो.

शौचालय नसल्याने स्त्रियांची कुचंबना होते. शहरात तर आणखीनच परिस्थिती गंभीर आहे. स्वच्छता समस्या आहेच शिवाय शौचालय घरी नसणे ही खेदाची बाब समोर आली. त्यामुळे हागणदारीमुक्त देश असणे खूप गरजेचे आहे. त्याबरोबर जर पायाभूत सुविधा प्राप्त झाल्या तर प्रत्येक नागरिक स्वच्छतेबाबत जागृत होऊ शकतो याची खात्री भारत सरकारने दर्शवली आणि ही मोहीम सुरू केली.

या मोहिमेचा उद्देश पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणावर तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणे, कचरा करणे टाळले पाहिजे. तसेच प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे गरजेचे बनले आहे. कितीही संस्था निर्माण झाल्या तरी त्या देशातील कानाकोपऱ्यात जाऊन काम करू शकत नाहीत म्हणून भारताचा नागरिक म्हणून शौचालयाचा वापर करणे, कचरा आढळल्यास स्वतः स्वच्छ करणे अशी कामे करणे स्वतः पार पाडली पाहिजेत.

२०१९ मध्ये महात्मा गांधींची १५०वी जयंती होती. संपूर्ण भारत स्वच्छ करणे हा मोहिमेचा उद्देश त्या जयंतीपर्यंत सफल ठरवणे असे कर्तव्य मानून प्रत्येक देशवासी झटला. तसेच आत्तापर्यंत झालेले स्वच्छतेचे काम हे प्रशंसनीय आहे. शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकार नऊ हजार आणि राज्य सरकार तीन हजार असे मिळून बारा हजार रुपये प्रत्येक शौचालयासाठी देत असते. सार्वजनिक शौचालयसुद्धा या योजनेत समाविष्ट आहे.

भारतात आज विविध स्तरांतील मान्यवर, सामाजिक संस्था, खेळाडू, अभिनेते या अभियानाचे चेहरे-मोहरे बनलेले आहेत. फक्त सरकारी योजना किंवा मोहीम म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाने या अभियानात सामील होणे आवश्यक आहे. ही मोहीम अशीच चालू राहावी आणि प्रत्येक भारतीय स्वच्छतेच्या स्वप्नाने भारून जावा अशी इच्छा सर्वांचीच आहे.

Leave a Comment