पाण्याचे महत्त्व – मराठी निबंध | Importance of Water Essay In Marathi |

पाणी हेच जीवन आहे असे आपण वारंवार ऐकत आलेलो आहे. त्याला जीवन का म्हटले आहे, आणि अशा पाण्याचे महत्त्व काय आहे, हे पाण्याचे महत्त्व या मराठी निबंधात (Importance of Water Essay In Marathi) स्पष्ट करण्यात आलेले आहे.

पाण्याचे महत्त्व निबंध मराठी | पाणी हेच जीवन | Panyache Mahattva Marathi Nibandh |

मानवी जीवनात आणि संपूर्ण सजीव सृष्टीसाठी पाण्याचे महत्त्व अपरंपार आहे. संपूर्ण पृथ्वीवर जवळपास ७० टक्के पाणीसाठा आहे. प्रत्येक वर्षी जलचक्र प्रक्रियेने पाऊस पडत असतो आणि पाण्याचा वापर पृथ्वीवर होत असतो.

वृक्ष, पशुपक्षी आणि मानव अशा सर्व प्रकारच्या सजीवांसाठी पाण्याचा उपयोग होत असतो. अन्ननिर्मिती प्रक्रिया, शरीर स्वच्छता आणि तहान भागवण्यासाठी पाण्याचा वापर होत आलेला आहे. जलचर प्राणी हे तर पाण्यातच निवास करत आपले जीवन जगत असतात.

पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व आहे. निसर्गात त्याचे अस्तित्व विपुल प्रमाणात आहे. पृथ्वीवर जीवन निर्मिती होण्यासाठी आणि तेच जीवन चालू ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. सजीवांचे पालनपोषण आणि उदरभरण होण्यासाठी पाण्याची गरज आहेच.

मानवी जीवन हे संपूर्णतः पाण्यावर आधारित आहे. आपल्या शरीरातसुद्धा सत्तर टक्के पाणी आहे. पाण्यामुळे आपण आपल्या शरीराची स्वच्छता राखू शकतो. इतर दैनंदिन कामे जसे की कपडे धुणे, जेवण बनवणे, घर व परिसर स्वच्छ करणे यासाठी पाण्याचा उपयोग होत असतो.

माणूस अन्ननिर्मिती करण्यासाठी शेती करत असतो. संपूर्ण शेतीची कामे पाण्यावरच अवलंबून आहेत. पाऊस अथवा पाण्याचा साठा नियमित उपलब्ध असेल तर आपण व्यवस्थित शेती करून अन्नधान्य उत्पन्न करू शकतो.

आपण अन्न ग्रहण न करता काही दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही. शरीरशुद्धी आणि इतर शारीरिक प्रक्रिया पाण्यामुळे सुरळीत घडतात. गरम, कोमट आणि थंड अशा विविध तापमान असणाऱ्या पाण्याचा उपयोग माणूस आवश्यकतेनुसार करत असतो.

पाण्याचे उपयोग आणि महत्त्व समजून घेऊन पाणी हेच जीवन आहे असे आपण म्हणू शकतो. पाणी ग्रहण करताना आणि त्याचा उपयोग करताना अत्यंत काळजीपूर्वक करावा. अनेक रोग पाण्यामुळे बरे होऊ शकतात तर अनेक रोगांची लागण देखील पाण्यामुळेच होत असते.

पाणी हा एकमेव घटक असेल ज्याचा उपयोग मानवासाठी सर्वच प्रकारे होत असतो. तो वापरत असलेल्या भौतिक वस्तूंच्या निर्मिती प्रक्रियेत सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. अशा प्रकारे जीवन निर्मिती आणि जीवन घडवणाऱ्या पाण्याला आपल्या अस्तित्वात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

तुम्हाला पाण्याचे महत्त्व हा मराठी निबंध (Importance of Water Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment