आत्मनिर्भर भारत मराठी निबंध | Self-reliant India Essay In Marathi |

आत्मनिर्भर भारत निबंध (Atm nirbhar Bharat Essay In Marathi) लिहताना प्रास्ताविक मुद्दे जसे जाहीर झालेले आहेत आणि भविष्यात या योजनेचे फायदे किंवा तोटे कसे असतील याची फक्त चर्चा करणे अपेक्षित आहे. भारतीय लोकसंख्या पाहता जर प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर झाला तर भारतीय अर्थव्यवस्था ही संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरू शकेल असा संदर्भ घेऊन सुरुवात करूया “आत्मनिर्भर भारत” या निबंधाला!

आत्मनिर्भर भारत अभियान निबंध ! Atm Nirbhar Bharat Abhiyan Marathi Nibandh

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या अभियानाची घोषणा केलेली आहे. “आत्मनिर्भर भारत” ही एक मोठी आर्थिक योजना म्हणावी लागेल. “भारताची अर्थव्यवस्था आणखी मजबूत आणि प्रबळ करण्यासाठी सर्व भारतीयांनी स्वावलंबी बनले पाहिजे तरच कोरोना विषाणू विरोधात लढताना आलेल्या आर्थिक संकटाचा सामना आपण करू शकू”, असा विश्वास माननीय नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे.

आत्मनिर्भर भारत अभियान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले आहे. दिनांक १२ मे २०२० रोजी या अभियानाची घोषणा झालेली आहे. हे अभियान म्हणजे एक आर्थिक योजना आहे ज्याद्वारे प्रत्यके भारतीय नागरिक देशाला समृद्ध बनवण्याच्या दृष्टीने एक पाऊल ठेऊ शकतो. त्या नागरिकास या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाईल. या योजनेचे एकूण बजेट तब्बल २० लाख कोटी रुपये एवढे आहे.

आपणा सर्वांना माहितच आहे की कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशावर लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे. ही परिस्थिती भयावह असली तरी यातून आपण संधी शोधून काढू शकतो. प्रत्येक व्यक्ती या समस्येतून स्वतः बाहेर पडू शकतो. स्वतःजवळ असलेल्या कलेतून आणि कौशल्यातून रोजगार निर्मिती करून प्रत्येक भारतीय स्वतः एक जबाबदार व्यक्ती तर बनुच शकतो शिवाय देशही प्रगतीपथावर नेऊ शकतो. संपूर्ण देशात उद्योग चळवळ उभी करून देशाची आर्थिक संपन्नता आपण वाढवू शकतो.

देशातील लघु उद्योग, मध्यम उद्योग यांना चालना देण्यासाठी नरेंद्र मोदींनी हे पॅकेज देशासमोर सादर केले आहे. तसेच शेती, शिक्षण आणि अन्य मोठे उद्योग यांनाही चालना मिळू शकेल अशीही उपाययोजना या अभियानात आहे. कोरोना संसर्गात सर्वात जास्त फटका बसला ते म्हणजे शेतकरी, मजूर, आणि कामगार! या सर्व घटकांना पुन्हा एकदा उभारी देण्याचे काम हे अभियान नक्कीच करेल.

समृद्ध भारत तेव्हाच होऊ शकेल जेव्हा प्रत्येक भारतीय म्हणजे १३० कोटी लोकसंख्या ही आत्मनिर्भर बनेल. कोरोना विषाणूच्या संकटात संपूर्ण जगासहित भारत देशही अडकला आहे. त्याची पर्वा न करता स्वतःच्या क्षमतांचा सुरक्षित पद्धतीने वापर करून देशाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम सर्व नागरिक करू शकतात. या योजनेत सर्व क्षेत्रे समाविष्ट केली जातील ज्यांचा हातभार देश विकासासाठी आत्तापर्यंत लागला आहे आणि भविष्यातही लागेल.

या योजनेचा लाभ घेऊन सर्व भारतीय नागरिक स्वतःच्या कुटुंबासाठी आर्थिक पाठबळ बनू शकतील. या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी हे आर्थिक स्वरूपाच्या मदतीसाठी योग्य ठरतील. केंद्र सरकारतर्फे त्यांना सर्वात मोठी आर्थिक मदत केली जाईल. भारत स्वावलंबी बनेलच यात शंकाच नाही परंतु यानंतरच्या काळात ही संकटाची परिस्थिती म्हणजे एक संधी मानली गेली पाहिजे. भारतीय केंद्र सरकार प्रत्येक व्यक्तीच्या मदतीला धावून येईलच फक्त तो व्यक्ती स्वावलंबी बनण्याच्या संकल्पाने भारून गेलेला असला पाहिजे.

तुम्हाला आत्मनिर्भर भारत मराठी निबंध (AtmNirbhar Bharat Abhiyan Essay in Marathi) कसा वाटला ? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा…

1 thought on “आत्मनिर्भर भारत मराठी निबंध | Self-reliant India Essay In Marathi |”

  1. मला तर खूप आवडलं तुम्ही तर पूर्ण भारतच डोळ्या समोर उभा केला
    खूप छान

    Reply

Leave a Comment